सरकारविरोधात लोकांनी बंड करावे – संभाजी भिडे

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर)- कोरोनामुळे जी लोक मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. मुळात कोरोना हा शारीरिक आजार नसून तो मानसिक आजार आहे. कोरोनाचे कठोर निर्बंध सरकारने लादण्याबाबत त्यांनी टीकाही केली. जनतेचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. ते दुशासन होता काम नये. लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि जनतेचे नुकसान होत आहे. हल्लीच्या राज्यकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही तसेच ते पुढे म्हणाले, लोकांनी आता बंड करावे.

प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, ‘समाज चालवण्यासाठी शासन आहे. पण, शासन हे दुशासन होता कामा नये. सध्या निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. सरकारच्या निर्णयांमुळे संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही. मुळात, कोरोना हा रोग नाही. कोरनाने जी माणसे मरत आहेत, ती जगण्याच्या लायक नव्हते.’

‘दारुची दुकाने उघडायला परवानगी आणि कुठे रस्त्यावर कुणी काही विकायला बसल्यावर पोलिस त्याला मारतात. हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत. खरतर कोरोना हा रोगच नाही. हा ‘त्या'(आक्षेपार्ह शब्द) वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे’, असे वादग्रस्त वक्तव्यही संभाजी भिडेंनी यावेळे केले.

भिडे पुढे म्हणतात की, ‘कोरोनामुळे मास्क घालायला लावतात. पण, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढलाय. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे. हातावर पोट असलेली अनेक माणसे उद्ध्वस्त झाली. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचे काम सुरु आहे. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे’, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here