विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेता विजय राजची उच्च न्यायालयात याचिका

नागपूर (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – गोंदिया जिल्ह्यात चित्रीकरणादरम्यान विनयभंग केल्याचा आरोपाखाली चित्रपट अभिनेता विजय राज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित तक्रार खोटी असून तो गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी विजय राजने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये गोंदिया जिल्ह्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी चित्रीकरणाच्या चमूतील एका महिलेने विजय राजने विनयभंग केला, असा आरोप लावला. गोंदियातील एका हॉटेलमध्ये राजने गैरवर्तन केल्याचा दावा करत महिलेने पोलीस तक्रार केली होती.

तिच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विजय राजवर विनयभंगप्रकरणी कलम ३५४(अ,ड)अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली होती. आता त्याने वकील अविनाश गुप्ता आणि अ‍ॅड. आकाश गुप्ता यांच्यामार्फत हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्या. झेड.ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी होणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here