कोरोनाविरोधातील लढाईत कुठलेही राजकारण आणू नका – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्रदेखील कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही. मात्र या लढय़ात कुठलेही राजकारण आणू नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांना समज द्या. राज्याने मोठय़ा प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत, असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्ष सवावर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर अडीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्रानेदेखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यादरम्यान साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करू व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविडबाधित रुग्णांची संख्या पाहता 1700-2500 मे.टन इतक्या ऑक्सिजनची एप्रिल अखेरपर्यंतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे. महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यांत 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले.

देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडिसीवीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किमतीवर ड्रग पंट्रोलरचे नियंत्रण असावे. महाराष्ट्रामध्ये आजघडीस रेमडिसीवीरच्या साधारणतः 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरू आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता एप्रिल अखेरपर्यंत ही गरज प्रतिदिन 90 हजार ते 1 लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. अनेक ठिकाणी केवळ सिटीस्पॅन केलेल्या रुग्णाला रेमडिसीवीर दिले जाते. आयसीएमआरलाही रेमडिसीवीरचा हा अति व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आहे. रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

प्राधान्यक्रम गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवडय़ात 40 लाख लसींचा पुरवठा करावा. आतापर्यंत राज्याला 1 कोटी 6 लाख 23 हजार 500 डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत 92 ते 95 लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली असल्याची बाब मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली. 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. त्याचप्रमाणे 25 वर्षांपुढील सर्वांना लसीकरण गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने जादा 1200 व्हेंटिलेटर्स द्यावेत तसेच जे पाठवले आहेत ते सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत . ते सुरू करण्यासाठी तंत्रज्ञ द्यावेत , ऑपरेशनल करून द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली .

हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन येथे कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी 228 दशलक्ष डोस तयार करण्यात येतील व लसीकरण मोहिमेला वेग येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य मीनाताई पाटणकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीदेखील लसीचा डोस घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here