नवी दिल्ली – देशात आता दिवसाला दोन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या चोवीस तासांमध्ये 1340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 2,33,943 नवे रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान चिंतेत भर टाकणारी बातमी म्हणजे, आता कोरोनाची लक्षणंही बदलली असल्याचं वृत्त समोर येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं म्हटलं आहे, की कोरोनाच्या अर्ध्या रुग्णांमध्ये यावेळी अशी लक्षणं आढळली आहेत, जी याआधी दिसली नव्हती. यात तोंड कोरडं पडणं हे प्रमुख लक्षण आहे. याला जेरोस्टोमिया असंही म्हटलं जातं. लागण झाल्यानंतर सुरुवातील हे लक्षण जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णामध्ये ताप, घसा दुखणे अशी लक्षणं दिसू लागतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तोंड कोरडं पडण्याचं एक मोठं कारण हेदेखील आहे, की शरीरामध्ये लाळ निर्माण करण्याची क्षमता कमी होते. लाळीमुळेच आपलं तोंड खराब किटाणू आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहातं. याशिवाय पचनक्रियेतही याची मदत होते. शास्त्रज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीलाच या लक्षणांवर लक्ष दिल्यास उपचार अधिक सोप्या पद्धतीनं होण्यास मदत होईल. यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासही मदत होईल.
एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणंदेखील एक लक्षण आहे. हेदेखील लाळ तयार न झाल्यानं होतं. यादरम्यान जीभ पांढरी पडल्यासारखं वाटू शकतं. ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळतात त्यांनी जेवण करतानाही त्रास होतो. लाळ नसल्यानं अन्न चावणंही अवघड जातं. याशिवाय बोलतानाही त्रास होतो.






