ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – जिल्ह्यातील भिवंडी येथे काटई गावात एका यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर तीन मजूर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून तिघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
काटई ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुकाराम कंपाउंड येथे हा कारखाना आहे. कारखान्याच्या जीर्ण भिंतीची डागडुजी सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता दुर्घटना घडली. भिंत कोसळून त्याखाली दबलेल्या तीन मजुरांचा मृत्यू झाला तर तीन जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिन्ही मृतदेह भिवंडी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहेत तर जखमींना भिवंडीच्या पी. डी. मेमोरियल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेत मनसुख भाई ( ४५ वर्षे ), रणछोड प्रजापती ( ५० वर्षे ), भगवान जाधव ( ५५ वर्षे ) या तिघा मजुरांचा मृत्यू झाला आहे तर बाळू पारधी ( ४० वर्षे ), विश्वास गायकर ( ४५ वर्षे ), अन्वर शेख ( ५५ वर्षे ), उमेश रामकृष्ण पाटील ( ४३ वर्षे) हे चौघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काटई गावात असलेल्या या यंत्रमाग कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्या होत्या. मोठी दुर्घटना घडण्याची भीती लक्षात घेवून गेल्या चार दिवसांपासून हा कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्याचवेळी कारखान्याच्या जीर्ण भितींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीसाठी परांची बांधण्यात आली होती. दरम्यान, लोखंडी अँगल, पत्रे व अन्य बांधकाम साहित्याचा भार भिंतीवर आल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. याबाबत निजामपुरा पोलीस अधिक तपास करत आहेत.






