नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वालदेवी धरणावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात पाच मुली आणि एका मुलाचा समावेश असून आतापर्यंत केवळ एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्र असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, सेल्फी घेण्याच्या नादात तोल गेला आणि हे सहा जण पाण्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकपासून जवळच वालदेवी धरण असून या धरणावर केलेलं बर्थडे सेलिब्रेशन सहा जणांसाठी शेवटचं ठरलं आहे. एकूण ९ जणांचा ग्रुप धरणावर गेला होता. ग्रुपमधील एका मुलीचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस धरणावर करण्याचा बेत सर्वांनी आखला होता. त्यानुसार या सर्वांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. केकही कापण्यात आला. त्यानंतर या सर्वांना सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि तिथेच घात झाला.
धरणाच्या कडेला उभे राहून सेल्फी काढत असतानाच तोल जावून पाच मुली खाली पाण्यात कोसळल्या. त्यांना वाचवण्यासाठी एका मुलाने उडी घेतली. मात्र, या सर्वांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ तसेच वाडीवरहे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने मदत व शोधकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत फक्त एका मुलाचाच मृतदेह हाती लागू शकला आहे. शोधकार्य रात्रभर सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही घटना कळताच या मुलांचे पालक व नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित ग्रुपमधील सर्व मुलं मित्र-मैत्रिणी होते. नाशिकच्या पाथर्डी भागात राहणारे हे सर्वजण होते, असेही सांगण्यात आले.






