मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा राज्य सरकारनं इशारा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी सलग काही ट्वीट केले आहेत. या ट्वीटमधून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही आहे’, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसंच, केंद्र सरकार त्यांना नकार देत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
‘भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहे. हे उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
‘रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात’, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
It is sad & shocking that when Government of Maharashtra asked the 16 export companies for #Remdesivir, we were told that Central Government has asked them not to supply the medicine to #Maharashtra.
These companies were warned, if they did, their license will be cancelled(1/2)— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
दरम्यान, ‘राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर कंपन्यांनी हे रेमडेसिवीर दिले तर त्या कंपन्यांचे परवाना रद्द केले जातील अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे.’ हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.







