मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता राज्यात कडक लॉकडाउन लागू करावाच लागेल, असा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच लॉकडाउनसंदर्भात निर्णय जाहीर करतील. परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
राज्यात आता संपूर्ण कडक लॉकडाउन लावणे गरजेचे असल्याचे मत सर्वच मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले. कोणकोणत्या गोष्टींवर कडक निर्बंध लावले जातील यावर देखील आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्या करतील, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. या बरोबरच आज जाहीर करण्यात आलेले आदेशीही उद्या रद्द होतील, असेही परब यांनी सांगितले.
राज्यात जसा करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला तसे कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र तरी देखील करोना नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे, असे परब म्हणाले. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरताना दिसत आहे. राज्यातील परिस्थितीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून त्याबाबतच्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली सविस्तर भूमिका उद्या मांडणार असल्याचे ते म्हणाले.






