कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधूपिता आणि वरपित्याविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार परवानगी घेतानाच, लग्नसोहळ्यात २५ जणांनाच सहभागी होता येणार आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करत बुलडाणा येथील खामगाव तालुक्यातील चिखली खुर्द येथे लग्नसोहळ्याला २५ पेक्षा अधिक जणांची उपस्थिती होती. हा सोहळा सुरू असतानाच, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत त्या ठिकाणी पोहोचले. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, वधूपिता आणि वरपित्यावर जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ओंकार किसन तांदळे (रा. चिखली खुर्द, ता. खामगाव) यांच्या घरी लग्नसोहळा होता. मोकळ्या जागेत मंडप टाकला होता. लग्नसोहळ्यात वधू-वराकडील मंडळी उपस्थित होती. या लग्नसोहळ्यात ३५ ते ४० जण होते. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. काही जणांच्या तोंडाला मास्कही नव्हता. लग्नसोहळा सुरू असताना, अचानक अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून एकच धावपळ उडाली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी वरपिता आणि वधूपित्यावर गुन्हा दाखल केला.

लग्नसमारंभासाठी २५ व्यक्तीच उपस्थित राहावे असा सरकारचा आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे या ठिकाणी दिसून आले. सरकारकडून सोशल मीडिया व विविध माध्यमातून जनजागृती करूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जलंब पोलीस ठाण्यात वधूपिता ओंकार किसन तांदळे आणि वरपिता सुखदेव इंगळे (रा. येनगाव ता. बोदवड जि. जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here