आटपाडी (प्रतिनिधी) – भारतीय महिलांच्या पाठीशी बंधुत्वाच्या भावनेने ठाम उभे राहणारे शरदचंद्रजी पवार साहेब देशातील एकमेव नेते असल्याची प्रचिती लोक माझे सांगाती हे पवार साहेबांचे आत्मचरित्र वाचल्यावर येते, या युगपुरुषाच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वाद घेण्यासाठी मी उतावीळ झाल्याची हृदय स्पर्शी भावना आटपाडी च्या सौ . अनिता विजयकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे .
सिव्हील इंजिनीअरींग मधील उच्च पदवी धारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा आटपाडीच्या कन्या सौ . अनिता पाटील यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शरदचंद्रजी पवार साहेबांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र वाचल्यावर भारावून जावून वरील भावना व्यक्त केली आहे .
शारदामाई उर्फ बाई या प्राणप्रिय मातेच्या संस्कारातून तावून सुलाखुन निघालेल्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुप्रियाताई या एकाच अपत्याला घर का चिराग बनविण्याचा प्रचंड धाडसी आदर्शवादी निर्णय घेत पत्नी सौ. प्रतिभाताईना जीवनात बरोबरीचे स्थान देणारे साहेब देशातील सर्वच महिलां भगिनींविषयी प्रचंड आस्था दाखविणारे देशातील एकमेव नेते असल्याची जाणीव पदोपदी होते .
शेतीचा शोध लावणाऱ्या आणि सर्वात आधी शेती कसणाऱ्या स्त्रिया याच प्रारंभी कर्त्या म्हणून इतिहासाने नोंदवून ठेवले आहे . पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या महिलांना संधी दिली गेल्यास त्या सर्वच क्षेत्रात यशस्वी होवू शकतात . हे ओळखून या प्रचंड ध्येयवादी शक्तीला संधी आणि ताकद देण्यात शरदचंद्रजी पवार साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे . राष्ट्रपती पदी प्रतिभाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी अनेक विरोधकांना प्रतिभाताई यांच्या पाठीशी उभे करणारे शरद पवार साऱ्या देशाने अनुभवलेले आहेत .महिलांना सर्वच क्षेत्रात वाव देण्यासाठी साहेबांनी प्रचंड यातायात केली आहे . त्यांच्याच प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ महिलांना झाला आहे .
महिलांच्या भारतीय लष्करात समावेशासाठी कवाडे उघडणारे शरद पवार हेच महिलांचे खरेखुरे पाठीराखे आहेत . आपल्यातला न्यूनगंड, भिती, दबाव, फेकून देवून सर्वच क्षेत्रातल्या आणि अगदी ग्रामीण भागातल्या स्त्रीयांनी धाडसाने पुढे आले पाहिजे . राजकारणातही मोठे बस्तान बसविले पाहीजे . हेच पवार साहेबांना अपेक्षित आहे . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर भविष्यात एखादया महिलेला संधी मिळवून देणारे शरद पवार साहेब हेच पहिले कर्ते करवते ठरतील . पवार साहेबांच्या मागे देशातल्या माता भगिनींनी मोठी ताकद उभी केल्यास देशातील सर्व विधीमंडळे, देशाची संसद आणि इतर सर्वच क्षेत्रात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून देण्यात आणि त्यांना बरोबरीचे स्थान प्राप्त करून देण्यात पवार साहेब शंभर टक्के यशस्वी होतील .असा विश्वास ही सौ .अनिता पाटील यांनी व्यक्त केला आहे .






