कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादर) – चिकोत्रा खोर्यातील काही गावांमध्ये सोमवारी सायंकाळी गारांचा अक्षरशः तुफानी पाऊस पडला. गारांचे प्रमाण इतके होते की, सार्या गल्ल्या पांढर्या शुभ— बनल्या होत्या. काश्मीरमधील बर्फाच्छादित भूभागाप्रमाणे या गल्ल्यांचे चित्र दिसत होते. विशेषकरून करड्याळ, जैन्याळ, नंद्याळ, अर्जुनवाडा या गावांमध्ये हा गारांचा वर्षाव झाला.
सोमवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्णता होती. रविवारी सायंकाळी थोड्या प्रमाणात पाऊस पडून गेला होता. दुपारनंतर पुन्हा पावसाची चाहूल लागत होती. सायंकाळी पाचनंतर जोरदार वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणात गारा पडत होत्या. सुमारे पाऊण ते एक तास हा गारांचा वर्षाव सुरू होता. पाहता पाहता या गावातील गल्ल्या गारांनी भरून गेल्या. त्यामुळे गल्ल्या काश्मीरप्रमाणे शुभ— बर्फाच्छादित दिसू लागल्या. एवढेच नाही तर काही ठिकाणी घरांच्या छपरावर देखील गारा साचलेल्या दिसत होत्या. अशा प्रकारच्या गारांचा वर्षाव प्रथमच अनुभवल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक देत होते.
लहान मुलांसह अन्य नागरिकांनी थेट बाहेर पडत या गारांचा आनंद लुटला. गारांच्या पावसाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या वळिवाच्या पावसाने प्रामुख्याने ऊस पिकाला मोठा दिलासा मिळाला असून खरीप पेरणीपूर्व मशागतीला देखील गती येणार आहे.






