मुंबई (विशेष प्रतिनिधी) – टाळेबंदीमुळे दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण तीन महिने ठप्प झाल्याने अडचणीत आलेल्या तंत्रज्ञ-कलाकारांना आता ९० दिवसांऐवजी तीस दिवसांनी मानधन देण्याचा निर्णय निर्मात्यांच्या संघटनांनी घेतला आहे.
चित्रीकरण बंद असल्याने कलाकारांना दैनंदिन गरजा, खर्च भागवणे कठीण झाले होते. अभिनेत्री हेमांगी कवी यांची कलाकारांच्या मानधनाबाबतची एक पोस्ट समाजमाध्यमांवर चांगलीच गाजली. आधीच टाळेबंदीमुळे शंभर दिवस काम नाही आणि त्यात काम सुरू होऊन शंभर दिवसांनी मानधन मिळणार. ३६५ दिवसांपैकी फक्त २०० दिवसांचे पैसे खात्यात जमा होणार आणि त्यातून दैनंदिन गरजा, इतर गोष्टींचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मानधनाचा मुद्दा चर्चेत आला.
तंत्रज्ञ-कलाकारांना दर महिन्याला पैसे देण्याची मागणी ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने निर्मात्यांकडे केली होती. यावर उपाय म्हणून ‘इंडियन फिल्म अॅण्ड टीव्ही प्रोडय़ुसर्स कौन्सिल’तर्फे ब्रॉडकास्टर्सशी झालेल्या बैठकीत ९० दिवसांनी मानधन देण्याची पद्धत काही काळ बदलून तीस दिवसांनी मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘टाळेबंदीमुळे मालिकेचे चित्रीकरण बंद असल्याने एप्रिल, मे आणि जून महिन्याचे मानधन मिळाले नाहीत. जुलैपासून मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्याने त्याचे पैसे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळतील. यामुळे कलाकार-तंत्रज्ञांची परवड होत असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडला. तीस दिवसांनी मानधन देण्याची मागणी वाहिन्यांनी मान्य केली. टाळेबंदीमुळे कलाकार, तंत्रज्ञांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वाहिन्या आणि निर्माते यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही वाहिन्या निर्मात्यांना पहिले सहा महिने तीस दिवसांनी मानधन देतील. त्यानंतर पुन्हा ९० दिवसांनी मानधन देण्याची पद्धत लागू होईल,’ असे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले. १३ जुलैपासून प्रसारित होणाऱ्या मालिकांचे मानधन ब्रॉडकास्टर्स आम्हाला ३० दिवसांनी देतील. यामुळे काही काळ कलाकार, तंत्रज्ञांना दर महिन्याला मानधन मिळेल, कौन्सिलचे अध्यक्ष जे. डी. मजेठिया यांनी सांगितले.







