सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – :पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७३३ मतांनी पराभूत केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे करोना संसर्गाने निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विधान परिषद निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा पातळीवरील निवडणुकांत महाविकास आघाडीचाच दबदबा पाहायला मिळत होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकजुटीने भाजपपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते व भाजपच्या पराभवांची मालिकाच लागली होती. पंढरपुरात मात्र यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले असून राष्ट्रवादीला आपला गड गमवावा लागला आहे. भाजपने समाधान अवताडे यांच्या रूपाने येथे तगडा उमेदवार दिला होता आणि भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आहे.
समाधान अवताडे आणि भगीरथ भालके यांच्यात येथे थेट लढत झाली. बाकी सर्व उमेदवार निष्प्रभ ठरले. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भालके हे आघाडीवर होते. मात्र नंतर अवताडे यांनी आघाडी घेतली आणि मतांमधील फरक थोड्या थोड्या मतांनी वाढतच गेला. सुरुवातीला पंढरपूर तालुक्यातील मतांची मोजणी झाली त्यात अवताडे पुढे राहिल्याने तिथेच जवळपास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. मंगळवेढ्यात अवताडे यांचा प्रभाव अधिक आहे. त्यानुसार त्यांना पाठबळही मिळालं आणि त्यांचा विजय सुकर झाला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात अत्यंत आक्रमकपणे प्रचार केला होता. त्यात धनगर समाजाचे नेते व भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि प्रशांत परिचारक यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यातून पंढरपुरातील गणितं बदलली आणि गेल्या निवडणुकीत जेमतेम ४० हजार मते मिळवणारे अवताडे लाखापार जाऊन विजयी झाले असे बोलले जात आहे.






