वाशिम – जिल्ह्यातील मानोरा शहराच्या नाईक नगर येथील विद्युत वितरण कंपनीचे रोहित्राला आग लागल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली. तब्बल दीड तासानंतर नगर पंचायत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, रोहित्र सलग दीड तास जळत राहील्याने त्याचा स्फोट होईल या काळजीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानोरा शहरातील नाईकनगर येथील रोहित्रास आग लागल्याची घटना घडली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. परंतु विद्युत वितरण कंपनीचा एकही कर्मचारी एक तास होईपर्यंत घटनास्थळी पोहोचला नाही. तोपर्यंत नागरिकांनी नगरपंचायतीच्या प्रशासनाला कळवले होते.
नगरपंचायचे अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल होण्यास काहीसा विलंब लागला. याचे कारण म्हणजे अग्निशमन वाहनाच्या टाकीत पाणी नसल्यामुळे आधी वाहन पाणी भरण्यासाठी गेले. त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी साडे अकरा वाजताच्या दरम्यान हे वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रोहित्राला लागलेली आग विझवण्यात आली.
रोहित्राला आग लागण्याचे कारण कळू शकले नाही. मात्र तरी देखील नाईकनगर येथील रहिवाशांमध्ये रोहित्र सलग दीड तास जळत राहील्याने त्याचा स्फोट होईल या भीतीने दहशत निर्माण झाली होती. तसेच मानोरा शहराला लागून असलेल्या गावांमध्येही आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान रोहीत्र जळाल्यामुळे येथील नागरिकांना ही विनावीज राहण्याची पाळी आलेली आहे. मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात रोहित्र बिगडण्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे वीज खंडित होण्याच्या घटनाही वाढत आहे. याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.






