नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – कोरोना महामारीने महाराष्ट्रातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. ऑक्सिजन व बेडअभावी अनेक रुग्णंना आपले प्राण गमवावे लागत आहेत. दिवसेंदिवस या परिस्थितीत अजूनच वाढ होत परिस्थिती गंभीर होत आहे. अद्यापही पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने, रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागत आहे.
महाराष्ट्राकरिता का होईना पुरेसा ऑक्सिजन तयार व्हावा म्हणून ज्या साखर कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प आहेत त्यांनी तात्काळ ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री जयंती पाटील यांनी केले असता, राज्यातील २०० साखर कारखान्यांमधून प्रथम पंढरपूरस्थित धाराशिव उद्योग समुहाने प्रतिसाद दिला. सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे प्रतिदिन १८ ते २० टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प हाती घेऊन अल्पावधीत तो पूर्णही केला. धाराशिव उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी घेतलेला पुढाकार व अल्पावधीत केलेली ऑक्सिजननिर्मिती यामुळे धाराशिव उद्योग समूह खऱ्या अर्थाने कोविड रुग्णांसाठी देवदूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

एवढेच नाही तर स्वतः अभिजीत पाटील यांनी पंढरपूरवासियांसाठी अद्ययावत असे कोविड रुग्णालयदेखील उभारले आहे. कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनिट १ मध्ये इथेनॉल प्रकल्पात ऑक्सिजन निर्मिती सुरु झाली असून, रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील रुग्णलयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्यात येईल असे धाराशिव कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या व तांत्रिक, आर्थिक मंजूरीसाठी वेळोवेळी प्रकल्पाला भेट देवून, प्रकल्प अल्पकाळात पूर्ण करून जनतेला सेवा उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य कोविड रुग्णांसाठी धाराशिव उद्योग समूह देवदूत ठरत असल्याचे मत धाराशिव संचलित वसाका मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, अध्यक्ष अशोक देवरे यांनी व्यक्त केले आहे.
सर्वप्रथम पुढाकार घेऊन अल्पावधीत ऑक्सिजन निर्मिती करुन सर्व साखर कारखान्यापुढे धाराशिव उद्योग समुहाने एक आदर्शच निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे वसाका कामगार संघटनेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.






