मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याशी तुलना केली होती. यावरून होळकर घराण्याकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. होळकर घराण्याचे भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
ज्या पद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला आहे.

राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये जर आपण राष्ट्रपुरुषांची नावे वापरुन त्यांची तुलना जर आजच्या नेत्यांशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. या पत्रात राऊतांनी ममता बॅनर्जी यांना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणारा नेता असंही संबोधलं आहे. तसंच अहिल्याबाईंचे विचार आचरणात आणून त्यांच्यासारखी कृती केल्यावर जनता आपली योग्यता ठरवेल असंही भूषणसिंह राजे होळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या आजच्या युगातील एका नेत्याशी कधीच होऊ शकत नाही. आधी अहिल्या मासाहेबांचे विचार आचरणात आणा, त्यांच्या सारखा रयतेचा सांभाळ करा मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही अशी टीका भूषणसिंह राजे होळकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.






