मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. देशमुख यांच्यावरील या कारवाईवर सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘देशमुख यांच्यावर ईडीनं दाखल केलेला गुन्हा हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचं व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचं प्रतीक आहे,’ असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात सविस्तर ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘करोनाच्या संकटाचा सामना करण्यात मोदी सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठी व जनतेचं लक्ष दुसरीकडं वळविण्याचा हा प्रयत्न आहे. ही केवळ राजकीय सूडबुद्धी आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021
‘परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून ही कारवाई केली जात आहे. देशमुख यांनी १०० कोटी जमवण्यास सांगितलं होतं असं सचिन वाझेनं म्हटलंय. परमबीर सिंग यांनीही तेच म्हटलंय. पैसे दिले असं कोणीही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाहीत तर ईडी (ED) कशाला?,’ असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
‘जर पैसे दिले असं CBI व ED चं म्हणणं असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का होत नाही? हा मोदी सरकारनं सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनताही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे ‘जोक’ झाला आहे,’ असंही सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.







