आदित्य ठाकरेंचं पर्यावरण प्रेम बोगस – आमदार अतुल भातखळकर

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील मेट्रो कारशेडच्या जागेवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं होतं. राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. पण त्यानंतर हा प्रकल्प मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमधून इतरत्र हलवण्यात आलं. त्यावेळी पर्यावरण प्रेमी म्हणून आदित्य ठाकरे यांची प्रतिमा पुढे आणण्यात आली होती. त्यानंतर आता याच ठाकरे सरकारनं आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरेच्या जागेवरून वादाला सुरुवात झाली आहे.

याच मुद्यावरून भाजपा मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आपलं तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारनं आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. असं करून ठाकरे सरकार आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचं कट कारस्थान करत आहे. ही बाब अत्यंत संतापजनक असून आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस आणि बेगडं आहे. अशा खोचक शब्दांत अतुल भातखळकर आदित्य ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

आरे मध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना ठाकरे सरकार आरे मध्ये तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. इतकंच नव्हे तर, हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असूनही आर्थिक फायद्यासाठी ही जागा बिल्डरांच्या घशात घातली जात आहे, असं आमदार भातखळकर यावेळी म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here