मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा सक्रिय

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – खेकड्यांमुळे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याचे विधान करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे माजी पुनर्वसन मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत हे तब्बल १९ महिन्यांच्या विजनवासानंतर सोलापूर जिल्हा शिवसेनेत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून तानाजी सावंत यांची नेमणूक झाली अन् सोलापुरातील शिवसेनेत गटबाजीला सुरुवात झाली. पुढे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्याचं खापरही तानाजी सावंत यांच्या माथी फोडलं गेलं. त्यानंतरही सावंत यांनी विद्यमान सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी म्हणून स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला. मात्र त्याकडे फारसं लक्ष न देता मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना साइडलाइन केले. त्यामुळे नाराज झालेल्या तानाजी सावंत यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सत्तास्थानांवर झाला होता. पुढे बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार तानाजी सावंत यांनी विजनवसात राहणं पसंत केलं होतं.

आता राजकीय खलबतांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंत हे पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होत आहेत. आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी ते सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११.३० वाजता पंढरपुरात तर दुपारी २ वाजता मोहोळ येथे मोहोळ आणि बार्शी येथील सेना पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर ४ वाजता उत्तर-दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी करोना संसर्गाची सद्यस्थिती आणि उपाय योजना यावर ते चर्चा करणार आहेत. त्यांनतर त्यांचा उस्मानाबाद दौरा असेल असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here