मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – देशात आणि राज्यात करोनाचा भीषण हाहाकार सुरू आहे. करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांचा जागोजागी खच पडला आहे. देश एकीकडे महामारीत असताना केंद्र सरकार मात्र वेगळ्याच कामात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी देशातील सद्यस्थितीवर कवितेच्या माध्यमातून परखड भाष्य केलं आहे.
यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील एक कविता मांडली आहे. ज्यामध्ये देशातील भीषण वास्तव मांडण्यात आलं असून यामध्ये मोदी सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुरू आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. त्यात लसींचा तुटवडा असताना मोदी मात्र नवे निवासस्थान सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात आणि दिल्लीत नवीन संसद भवन उभारण्यात व्यस्त असल्याचंही यामध्ये अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
https://fb.watch/5t-CdKkT-7/ इतकंच नाहीतर या देशाचा आक्रोश ५६ इंचाची छातीला जाणवत नाही का ? असा थेट सवाल अमोल कोल्हे यांनी या कवितेत केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती आणि त्यावर सरकारचं काय सुरू आहे, असे अनेक मुद्दे मांडले आहेत. सोशल मीडियावर सध्या या व्हीडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये त्यांनी आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल आणि सध्या काय राजकारण सुरू आहे, यावर यामध्ये परखड भाष्य केलं आहे.
दरम्यान, देशात करोना संक्रमण घातल असलेलं थैमान आता हळूहळू ओसरताना दिसतंय. गेल्या काही दिवसांत करोना संक्रमित रुग्णांची संख्या थोडी कमी झालेली दिसतेय. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (१३ मे २०२१) ३ लाख ४३ हजार १४४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४००० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.






