गुवाहाटी (आसाम) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका आता दहशतवाद्यांनाही बसू लागला आहे. त्यामुळेच उल्फा दहशतवादी संघटनेने तीन महिन्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. उल्फा (आय) चा म्होरक्या परेश बरुआने म्हटले की, राज्यातील लोकांना कोरोना संसर्गामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पुढील तीन महिने कोणतीही मोहीम आखली जाणार नाही.
दुसऱ्या लाटेमुळे आसाममध्ये आतापर्यंत ३.१५ लाख लोकांना बाधा झाली असून १९८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४२१४४ आहे. यादरम्यान, बरुआने काल तिंगराई येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात संघटनेचा हात नसल्याचे म्हटले आहे.
या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.सध्या नागरिक संकटाचा सामना करत असताना हा स्फोट दुर्दैवी असल्याचे बरुआ म्हणाला. सुरक्षा दलाचा एक गट संघटनेची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोपही त्याने यावेळी केला. आसामचे नवे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी बरुआ यांना शांततापूर्ण वाटाघाटीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.






