मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. कोकणात रत्नागिरीमध्ये आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली असून देवभूमी केरळलाही वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे.
केरळमध्ये अनेक ठिकाणांवर विजेचे खांब आणि झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. या वादळाचा रोख हा गुजरात, दमण-दिवू आणि दादरा- नगर हवेलीच्या दिशेने असला तरीसुद्धा कोकण आणि किनारी भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसू लागला आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी ७१ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्या या केंद्रांमध्ये ५४३ कुटुंबातील २०९४ लोकांना ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.






