मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं मुंबईत लॉकडाउन करण्यात आलं. परिणामी मनोरंजनसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला. मग या आर्थिक संकटातून स्वत:ला सावरण्यासाठी निर्मात्यांनी गोवा गाठलं. परंतु तिथून देखील काही दिवसांतच त्यांना मुक्काम हलवावा लागला. मग त्यांनी थेट ओडिसाला जाऊन आपलं बस्तान बांधलं.
दुदैवाची बाब म्हणजे आता तिथून देखील त्यांना काढता पाय घ्यावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं ओडिसा सरकारनं देखील मालिकांच्या शूटिंगसाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे. परिणामी टीव्ही मालिकांसाठी पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याच्या काळात ज्या मालिका नवे भाग प्रसारित करतायेत त्यांनाच चांगला टीआरपी मिळत आहे. त्यामुळं निर्माते अगदी वाट्टेल ती खटपट करुन चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या निर्मात्यांचं बजेट चांगलं होतं त्यांनी विविध राज्यांचे पर्याय वापरुन पाहिले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं आता ते पर्याय देखील बंद होताना दिसत आहेत. शिवाय संपूर्ण सेटअप आणि क्रू मेंबर्स त्या ठिकाणी नेण्यासाठी लागलेला पैसा देखील वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा गेल्या वर्षी प्रमाणेच मालिकांचे रिपिट टेलिकास्ट पाहायला लागू शकतात.






