मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – उन्हाळी सुटीतील न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने बुधवारी जवळपास १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले. जास्तीत जास्त वेळ न्यायालयीन सुनावणीचे काम करत असल्याबद्दल पूर्वीपासूनच परिचित असलेले न्या. काथावाला यांनी उन्हाळी सुटीतही ‘रेकॉर्डब्रेक’ काम केल्याने वकील वर्गात हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला.
सध्याच्या संकट काळात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या आदेशानुसार, केवळ तातडीच्या व महत्त्वाच्या प्रकरणांवर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावण्या होत आहेत. सध्याच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीत तातडीच्या प्रकरणांवरील सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्तींनी ठराविक न्यायालयेच निश्चित केली आहेत. त्यात या संपूर्ण आठवड्यासाठी न्या. काथावाला व न्या. तावडे यांच्या खंडपीठाचाही समावेश आहे. त्यानुसार, खंडपीठाने बुधवारच्या दिवसासाठी ८० प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली होती.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी व हनी बाबू यांचे अंतरिम जामिनाचे अर्ज, कोस्टल रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या झाडांवरील तोडकामाची कारवाई, दहावीच्या परीक्षेचा प्रश्न, माजी गृहमंत्री अनलि देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने केलेल्या एफआयआरमधील राज्य सरकारच्या संदर्भात असलेल्या आक्षेपार्ह भागाविषयी राज्य सरकारने केलेली याचिका अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा त्यात समावेश होता. सर्वात शेवटी अनिल देशमुख प्रकरणाची सुनावणी खंडपीठाने घेतली. मात्र, ती अपूर्ण राहिली आणि रात्री उशिरा ११.१५ वाजता खंडपीठाने आपले न्यायालयीन कामकाज थांबवले.






