दोन वर्षांपासून बंधक बनविलेल्या ९ ऊसतोड कामगारांची सुटका

सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – दोन वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी आणलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांची जालन्यातील जालना पोलिसांनी अखेर सुटका केलीय. गेल्या २ वर्षांपासून या नऊ जणांना सोलापूर जिल्ह्यातील बाधलेवाडी या ठिकाणी ऊस तोड मुकादमासह त्याच्या सासऱ्याने बंधक करून ठेवलं होतं.

याप्रकरणी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आलीय. याप्रकरणी ऊस तोड मुकादम भरत आलदार आणि डिगांबर माने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे आता वर्ग करण्यात आला आहे.

उस तोडणीनंतर काम संपल्यानंतर या नऊ जणांना एका शेतात बंधक करुन ठेवण्यात आले होते. या नऊ मजुरांकडून शेतीचे काम करुन घेण्यात येत होते. मात्र, एका महिलेच्या चालाखीने या मजुरांची सुटका करण्यात आली.

मारीया घुले, त्यांच्या आई आणि मुलगी यांनी दवाखान्यात जायचं निमित्त करून जालना गाठलं आणि आमदार कैलास गोरंटयाल यांना हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी या महिलेला कदीम जालना पोलिसांकडे पाठवलं. या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांनी तातडीनं एक पथक सोलापूरकडे रवाना करून मारीया यांच्या कुटुंबातील सर्वांची सुटका केली. दरम्यान याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here