मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील विविध भागात रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याच परिस्थितीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र याबाबत शंका उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे.
‘मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते, मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता,’ असा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ‘याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावुक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे,’ असंही नवाब मलिक म्हणाले.
‘देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला. औषधोपचार मिळत नाहीत. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले त्याबाबत लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत,’ असं म्हणत नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान मोदी खरंच भावुक झाले की नाही, हे ते स्वत:च नेमकेपणाने सांगू शकतील, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.






