जोगेश्वरी (प्रतिनिधी चेतन किर्दत) – निसर्ग चक्रीवादळाच्या कटू आणि भयानक आठवणी ताज्या असतानाच, सु सु करीत भयाण अंधारात घरांना धडका देणाऱ्या प्रचंड वाऱ्याच्या भीतीने डोळे छताकडे लागले होते. निसर्ग चक्री वादळाची आठवण करून देणारा तौक्ते वादळामुळे घराघरात भेदरलेली मने एकमेकांना धीर देत होती. पुन्हा आपला संसार उघड्यावर पडणार तर नाही ना या भितीने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू टपकले.

तौक्ते वादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रहिवाशांना फटका बसला असून मुंबईतील जोगेश्वरी येथे अनेक घरांवरील पत्रे उडाले, कौले फुटली, घरांच्या भिंती पडल्या तसेच वादळामुळे विविध ठिकाणी झाडे कोसळली, लोकांच्या घरात पाणी शिरले, शौचालयाचे पत्रे उडाले असे अनेक प्रकारचे नुकसान जनतेला सहन करावे लागले.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात लोकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांची शाखानिहाय माहिती गोळा करून स्थानिक आमदार तसेच माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांनी शुक्रावर दि. २१ मे रोजी एकूण ८५ कुटुंबांना आर्थिक मदत केली. विभागातील ज्या ज्या नागरिकांचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे त्यांचे त्वरित पंचनामे करून शासनाच्या निर्देशाप्रमाणे मदत मिळवून द्यावी अश्या सूचना आमदार रविंद्र वायकर यांनी अंधेरी विभागाचे तहसीलदार पवन चांदक यांना दिल्या. तसेच शासनाकडून उचित ती आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, रचना सावंत, नगरसेवक श्री प्रवीण शिंदे, रेखा रामवंशी, शालिनी सावंत, उपविभाग प्रमुख जीतेंद्र वळवी, बाळा साटम, के. एल. पाठक, शाखाप्रमुख संदीप गाढवे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नंदू ताम्हणकर, मांजरेकर, भाविसेचे कांदळगावकर, हर्षदा गावडे, चित्रा चव्हाण, समीक्षा माळी, उमेश कदम, अंकुश मोरवेकर, उदय हेगिष्टे, महाडिक, उमेश येरागी, भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.






