कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – लॉकडाऊन काळात जगण्याचा प्रश्नच गंभीर झाल्याने मेटाकुटीला आलेल्या अनेकांना कोल्हापूर पोलीस मदतीचा हात देत आहेत. पोलिसांची लाठी मारण्यासाठी नाही तर ती आधार देण्यासाठी असल्याचे सांगत राबविलेल्या ‘मिशन संवेदना’ उपक्रमाने अनेकांना आधार मिळाला आहे. कुणीही उपाशी राहू नये म्हणून त्यांच्या घरापर्यंत धान्य पोहचवण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून गेलेल्या पोलिसांनी माणुसकीची आणि सामाजिक बांधिलकीची नवी भिंतच बांधली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभर लॉकडाऊन सुरू आहे. केवळ अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास परवानगी आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. महिन्यानंतरही व्यापारासह सारेच बंद असल्याने अनेकांना जगणेही मुश्किल झाले आहे. रोजगार बंद आहे. हाताला काम नाही. त्यामुळे रोज पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशा रोजच्या रोजंदारीवरच पोट अवलंबून असलेल्यांसाठी पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. रस्त्यावर वर्दळ नसल्याने अनेक भिकारी उपाशी राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनाही जेवण पुरविण्यात आले. हंगाम बंद झाल्यानंतर गावाकडे न परतलेल्या उसतोड मजुरांना महिनाभराचे राशन देत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी अशा लोकांना थेट घरपोच धान्य दिले. काहींना तर जेवणही पोहचवले. रोज दोन हजारावर कुटुंबाना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीची नवी भिंत पोलिसांनी बांधली. हातात लाठी घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांनी वेगळ्या प्रकारे आपली संवेदना व्यक्त केली. एकटे राहणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा नागरिकांच्या मदतीलाही पोलीस धावून जात आहेत. त्यांना थेट फोन करून काय मदत हवी का, अशी विचारणा केली जात आहे. त्यांना औषधे, किराणा सामान आणून देतानाच बँकेतील पैसे काढून देण्याची जबाबदारीदेखील पोलिसांनी घेतली आहे. करोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. यासाठी रस्त्यावर अडवत पोलीस कारवाई करत आहेत. यामुळे रोज वादावादीचे प्रसंग येत आहेत. अशावेळी पोलिसांची वेगळी प्रतिमाच मिशन संवदेनाच्या माध्यमातून पुढे येत आहे.






