चंद्रपूर – जिह्यात मागील पाच वर्षे असलेली दारूबंदी आज अखेर उठविण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारूचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून 1 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात आलेली दारूबंदी उठविण्याचा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला.
चंद्रपुरातील दारूबंदीबाबत जुलै, 2018 मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
या समितीने 9 मार्च 2021 रोजी सरकारला अहवाल सादर केला. दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारूबंदी मागे घेण्याच्या बाजूने कौल दिला आणि झा समितीने दारूबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे.






