नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित आहेत. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी आहेत.
या महत्त्वपूर्ण बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना संकटात परीक्षा कशा घेण्यात येतील, परीक्षा घेतली जाईल की नाही, यावर चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल आज बोर्ड परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार होते, परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
शिक्षण मंत्रालयाला 03 जूनपर्यंत परीक्षांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी लागणार असल्यानं आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. केंद्र सरकारने काल 31 मे रोजी परीक्षांविषयी निर्णय घेण्यासाठी 2 दिवस अवधी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजही बैठक झाली.
या बैठकीत पंतप्रधानांकडून मंत्री अधिकाऱ्यांसमवेत परीक्षा घेण्याचे पर्याय आणि परीक्षा रद्द करण्याच्या पर्यांयावर चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत CBSE कडून बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी दोन पर्याय सुचवले होते. सर्व विषयांची परीक्षा कमी झालेल्या पॅटर्नवर घेण्याचा पहिला पर्याय होता, तर दुसरा पर्याय फक्त महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे हा होता.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सतत परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या शब्दांकडेही लक्ष दिले पाहिजे. या साथीच्या काळात ऑफलाइन परीक्षांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होण्याचा धोका आहे.






