अहमदनगर (प्रतिनिधी) – अवकाळी पावसाने जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. उत्तरेतील कोपरगाव आणि राहाता या दोन्ही तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.
दररोज सायंकाळी पाचनंतर पाऊस कोसळत आहे. आज सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने फळबागा, जनावरे, चारापिकांचे नुकसान झाले. सलग तीन दिवस झालेल्या या पावसामुळे नांगरट झालेल्या शेतातील ढेकळे फुटली आहेत. जमिनीतील उष्णता कमी होऊ लागली आहे. आज नगर तालुक्यात 13.3 मि.मी., पारनेर 24.4, श्रीगोंदे 13.4, कर्जत 22.8, जामखेड 11.5, कोपरगाव 29.1, राहाता 12.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.






