औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनलॉक अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अनलॉकच्या नियमांनुसार औरंगाबाद जिल्हा हा तिसऱ्या टप्प्यात असून इथेही काही प्रमाणात नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शहरवासीयांना पहिल्याच दिवशी ट्रॅफिक जॅमचा फटका बसला आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
अनलॉक अंतर्गत औरंगाबाद शहरात दुकाने तसेच इतर आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते दुपरी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. याच कारणामुळे अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडले आहेत. गुलमंडी, पैठण गेट परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गर्दीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.
राज्य सरकारने अनलॉक केल्यामुळे औरंगाबादेत नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे शहरामध्ये तुफान गर्दी उसळली आहे. गुलमंडी, पैठण गेट परिसरातील बाजारपेठांमध्ये सर्व महत्त्वाचे रस्ते ट्रॅफिकमुळे जॅम झाले आहेत.