मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मान्सूनने धडाक्यात एंट्री केली आहे. पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे, मुंबईच्या रस्त्यावरची शान असलेल्या बेस्ट बसमध्येही पावसाने शिरकाव केला आहे. त्यामुळे गळती लागली आहे. पाण्यात भिजू नये म्हणून ड्रायव्हरला छत्रीच हातात घ्यावी लागली आहे.
मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईकरांची खास असलेल्या बेस्ट बसला पावसाचा फटका बसला आहे. लॉकडाऊनची निर्बंध हटवल्यामुळे बेस्ट वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. पण, पावसामुळे बसमध्ये गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
बसमध्ये पावसाचे पाणी बऱ्याच भागातून गळत आहे. एवढंच काय तर ड्रायव्हरच्या सीटवरही पाणी गळत आहे. त्यामुळे पाण्यात भिजू नये म्हणून चालकाने छत्रीचा आसरा घेतला आहे. विशेष म्हणजे, ही एसी मिनी बस आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात या मिनी बस दाखल झाल्या आहे. कमी पैशात गारेगार प्रवास अशी बसची खासियत आहे. पण, पहिल्याच पावसात बसच्या बाहेर आणि आतही पावसाळा अनुभवायला मिळत आहे.






