मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मालवणी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण गंभीर जखमी आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्शिमनन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतलं असून आत्तापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत काल सकाळपासूनच पावसानं जोर धरला होता. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या इमारतीला बसला आहे. मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारी असलेल्या दोन मजली घरांवर पडला. इमारतीवर इमारत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली होती.
मालवणी परिसरात असलेली ही इमारत धोकादायक होती का?, असे अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत तळ अधिक तीन मजल्यांची होती. त्यामुळं ही इमारत धोकादायक स्थितीत होती का?, याबाबत अद्याप मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.
दुर्घटनेदरम्यान इमारतीत २०हून अधिक लोक इमारतीत राहत असल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातील आत्तापर्यंत १८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ ते १५ वयोगटातील ८ मुलांचा समावेश आहे. तर, ४ पुरुष व ३ महिला यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जखमी व्यक्तींपैकी ४ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही दुर्घटना ११च्या सुमारास घडली असून सुरुवातीला एक चार मजली इमारती कोसळली. या घरात ७ जण राहत होते. ही इमारत कोसळल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एक अशी दोन घरं कोसळली. यातील एक घरात ७ जणं राहत होते. त्यातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घरातील २ लहान मुलांनाही बचावण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.






