उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश; आ.महेंद्र दळवी, राजा केणी यांच्या प्रयत्नाना यश
अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – तालुक्यातील कुर्डुस, कुसुंबळे व श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या 37 गावांना मागील अनेक वर्षापासून दुषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महेंद्र दळवी हे अलिबाग-मुरुडचे विधानसभेचे आमदार झाल्यापासून त्यांनी या समस्येकडे व्यक्तिशः लक्ष घातले असून या गावातील 22 हजार नागरिकांना फिल्टरचे शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष बाब म्हणून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीला ही योजना राबवण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. सुभाष देसाई यांनीच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनेनुसार एमआयडीसीने योजनेचे सर्वेक्षण पुर्ण केला आहे. या योजनेसंदर्भात सुभाष देसाई यांनी त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली. फिल्टरद्वारे शुद्ध पाणी देण्याची योजना राबवल्यास येथील 22 हजारहुन अधिक नागरिकांचे आरोग्य सुधारु शकते, राजा केणी यांनी या विषयाची योग्य पद्धतीने मांडणी करत या योजनेचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही योजना तत्काळ राबवण्यासाठी कार्यवाही सुरु करावी, असे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत. यामुळे या तीन ग्रामपंचायतींना एकाच योजनेतून फिल्टरद्वारे शुद्ध केलेले पाणी मिळणे शक्य होणार आहे, असे शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांचे म्हणणे आहे.

अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने येथील नागरिकांना आरोग्यच्या अनेक समस्या जाणवत आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी देण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, याकडे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कधीच लक्ष दिलेले नव्हते. केवळ निवडणुकीच्या वेळेला मत मागण्यासाठी येणाऱ्या पुर्वीच्या राजकर्त्यांनी येथील नागरिकांच्या मुख्य समस्याच कधी जाणून घेतल्या नाहीत. यामुळे या परिसरात काविळ, मलेरिया, किडणीचे आजार, पचनाचे आजार असे सतत जाणवत असतात.
मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सतावणाऱ्या या आरोग्य विषयक समस्येमुळे जीव देखील गमवावे लागले आहेत. यातून येथील नागरिकांची आता सुटका होईल अशी आशा शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केली आहे.यावेळी मंत्रीमहोदय यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चा करताना मा.आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील रत्नाकर पाटील युवा सेनेचे कुर्डूस विभाग प्रमुख अभिषेक पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते






