बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय शुक्रवारी (11 जून) जारी करण्यात आला. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं.

बारावीच्या परीक्षेचं महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करुन पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here