ठाण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, प्रवाशांवर जीवघेणे हल्ले.

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे ) – ठाण्यात सध्या रेल्वे आणि रिक्षाने प्रवास करणं अवघड होत चालल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरामुळे डोंबिवलीच्या महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे तीन दिवसांपूर्वी ठाण्याच्या तीन हात नाक्याजवळ चालत्या रिक्षातील महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातही महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या दोन्ही गोष्टी ताज्या असताना कल्याण रेल्वे स्टेशनवर पुन्हा तशीच काहीशी घटना घडली आहे. या घटनेत एक प्रवासी जखमी झाला आहे. मोबाईल चोरांच्या या सुळसुळाटमुळे प्रवाशांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे.

ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्यासोबतच्या झटापटीत विद्या पाटील या महिला प्रवाशाचा जीव गेला. ही घटना ताजी असताना आता कल्याण रेल्वे स्थानकात अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एक प्रवासी ट्रेनच्या दारात उभा असताना चोरट्याने त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने चोरट्याचा प्रतिकार केला. चोरट्याने झटापटीत प्रवाशांच्या नाकावर जोरदार प्रहार केला. ट्रेन सुरु होताच चोरटा पळून गेला. या झटापटीत प्रवासी रक्तबंबाळ झाला.

प्रत्यक्षदर्शी यशवंत राऊत आणि अन्य प्रवाशांनी जखमी प्रवाशाला टिटवाळा रेल्वे स्थानकात उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी साधी प्रथमोपचाराचीही सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त झाले. एका प्रवाशाचा या संदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एकीकडे चोरीचा प्रकार दुसरीकडे साधी प्रथमोपचाराचीही सुविधा नाही. तिसरीकडे रेल्वे गाड्या पुरेशा सोडल्या जात नाहीत. प्रवाशांना या सगळ्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच प्रवाशांच्या जीविताची कोणतीही सुरक्षितता नाही हेच पुन्हा या घटनेतून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here