मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (२३ जून २०२१) उघडकीस आला. या रुग्णाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात श्रीनिवास यल्लपा यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तीन दिवसांपूर्वी श्रीनिवास यल्लपा नावाच्या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवास यांचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान या रुग्णाच्या मृत्यूचे नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणावर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना विचारले असता त्यांनी म्हटलं, “उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला असावा अशी शक्यता आहे.” डॉक्टरांनीही शक्यता नाकारली नसल्याने पालिकेच्या रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर आयसीयू वॉर्डमध्ये असा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असाही प्रश्न उपस्थित होत आहे.






