मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वेकडून मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस देखील सुरू करण्यात येणार आहे.
डेक्कन क्वीनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. हे कोच पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. ताशी 180 किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेतील असे हे कोच आहेत. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे हे या कोचचे वैशिष्ट्य आहे.






