पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात भाजप चक्का जाम आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला.
‘सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादर करू शकले नाही. गेल्या १५ महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, मन मोठे ठेवून निर्णय घेता आले पाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळे जनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे, त्यामुळे आरक्षण मिळवून देणारच, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘जोपर्यंत स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. पाच जिल्ह्यात निवडणुका जाहीर झाल्या आहे. हे सरकार निवडणूक आयोगाला पत्र देत आहे. पण, यांनी जर विरोधी पक्षाला सोबत घेऊन एक समिती स्थापन करून निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणूक पुढे ढकलता येतील. पण हे सरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली.
जिल्ह्यात तब्बल २४ ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चक्काजाम नंतर राज्य सरकारने ओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.






