राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्यात आठवडाभरापासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. राज्यात पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यभर जोरदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. इतकंच नाहीतर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here