देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, हजर राहण्याचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं
अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी 5 जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रं मागितली आहे. त्यासाठी देशमुख यांनी ईडीकडे ‘ECIR’ ची कॉपी मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं.






