मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. यातच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्की प्रकारावरून भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
१ वर्ष निलंबन झालेल्या आमदारांमध्ये आशिष शेलार यांचाही समावेश आहे. याबाबत बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपाच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्षांना कुठेही धक्काबुक्की झाली नाही.
ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केली. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटत असेल तर पक्षाच्या वतीने क्षमा मागतो असं आम्ही सांगितले. परंतु तालिबानी सरकारने आमच्या आमदारांवर कारवाई केली. सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी करू असा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.






