मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्याला काल मोठा दिलासा मिळाला असताना मंगळवारी सोमवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही सोमवारच्या तुलनेत वाढ दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १० हजार ५४८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात फक्त १७१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २९७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ६७० इतका आहे. तर, ठाण्याच्या खालोखाल पुण्यात एकूण १६ हजार ५२४ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १२ हजार ९८८ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ८७०, साताऱ्यात ही संख्या ७ हजार २७१, रत्नागिरीत ५ हजार ०८३, रायगडमध्ये ४ हजार ५१७, सिंधुदुर्गात ४ हजार ०८६, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ६५९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३१९ इतकी आहे.
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार २८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये ९५०, नांदेडमध्ये ही संख्या ४९७ इतकी आहे. जळगावमध्ये ७९४, तसेच अमरावतीत ही संख्या ३४० इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या ठाणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५० इतकी आहे.






