कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?; मुंडे भगिनींच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांचा ‘हा’ प्रतिप्रश्न

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं?’ असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

नाशिक महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस आज शहरात आले असता पत्रकारांनी नेमका त्यांना हाच प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात,’ असं ते म्हणाले. ‘नारायण राणे यांना मंत्री बनवताना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार केला गेला आहे. दुसरा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही,’ असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. या विस्तारात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील व डॉ. भागवत कराड या चौघांना स्थान देण्यात आलं आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा कालपर्यंत होती. त्या दिल्लीला रवाना झाल्याचं वृत्तही आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘आमच्यापैकी कुणीही दिल्लीला गेलेलं नाही. आम्ही मुंबईतील निवासस्थानीच आहोत,’ असा खुलासा त्यांनी केला होता. शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्र्यांच्या अभिनंदनाचं ट्वीटही मुंडे भगिनींनी केलं नव्हतं. त्यामुळं त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here