एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पोलिसांचा मार; व्यापाऱ्यांचे जगणे मुश्कील

मुंबई भाजपाची टीका : वसुलीबाजांच्या राज्यातला व्यापार गुन्हा ठरलाय

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे, प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. परंतु असे असले तरीही मात्र निर्बंध अजूनही तसेच आहेत. त्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. इतर दिवशी चार वाजेपर्यंत दुकाने खुली करण्याची परवानगी असली तरी शनिवार, रविवार दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच व्यापारी, फेरीवाले, दुकानदार यांनी दुकाने उघडी ठेवली, फेरीवाले रस्त्यावर बसले तर त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.

यावर मुंबई भाजपाने टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अंधेर नगरी, चौपट राजा याचा अनुभव राज्यातले व्यापारी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यावसायिक-दुकानदारांच्या धंद्यावर उठलेत. पाठोपाठ पोलिसांनीही दंडुका उगारून खंडणी गोळा करणं सुरू केलंय. वसुलीबाजांच्या राज्यात व्यापार गुन्हा ठरलाय.

सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी दुकाने बंदच ठेवावी लागतात. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावीत, असा नियम आहे. असे असले तरी मुंबई पोलिस मात्र काहीठिकाणी वसुली करून दुकानदारांना दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देत आहेत. तर काहीठिकाणी दुकाने वेळेपेक्षा अधिकवेळ उघडी असली तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एकूणच व्यापाऱ्यांना कुठूनही त्रासच सहन करावा लागतो आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी शनिवारी तसेच रविवारी सर्वच प्रकारची दुकाने उघडलेली होती. रविवारचा दिवस असल्याने मासांहारी बाजारातही गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत फेरीवाल्यांना दंडुक्याचा धाक दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here