मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी पहायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबईत चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, सायन, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरात रस्त्यांवर पाणी आल्याचं दिसून येत आहे. अशीच परिस्थिती ठाणे, नवी मुंबईतील सखल भागांत निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर अद्यापही कमी होत नाहीये तसेच दिवसभर हा पाऊस अशाच प्रकारे बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






