मुंबईत पावसाचं धुमशान : भांडुप,मुलुंड परिसरात पाणी तुंबले

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : मुंबईत पावसाने जोर धरला असून भांडुप,मुलुंड परिसरात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे.

रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी १५ ते २० मिनिटं लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, आता विक्रोळी ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

दरम्यान, अंधेरी पश्चिमेतील एस.व्ही.रोड येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात मध्यरात्री तीनच्या सुमारास मोहम्मद पटेल (२६) या तरुणाला विजेचा झटका बसला. ही घटना समजताच त्यास तातडीने विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, पहाटे ४.१५ च्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाने शॉर्ट सर्किट, वीजपुरवठा खंडित होण्यासारखे प्रकार उद्भवले. गेल्या २४ तासांत शहर भागांत सहा, पश्चिम उपनगरांत चार, पूर्व उपनगरांत तीन अशा शॉर्ट सर्किटच्या १३ घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here