चौधरी यांनी जामीन अर्जात केला गंभीर आरोप : अजून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी विशेष न्यायालयात मंगळवारी जामिनासाठी केलेल्या अर्जात गंभीर आरोप केला आहे. राजकीय षडयंत्रातून मला बळीचा बकरा बनवले गेले आहे, असा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला आहे. अॅड. मोहन टेकावडे यांच्यामार्फत चौधरी यांनी हा अर्ज केला असून आपल्याविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) कारवाई होऊच शकत नाही, असेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
दरम्यान, त्यांची २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आधी चार वेळा गिरीश चौधरी यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आले होते. आता त्यात बदल करून न्यायालयाने चौधरी यांना न्यायालयीन कोठडीत धाडले. पुणे भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात गिरीश चौधरी यांना ६ जुलै रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. तेव्हापासून चौधरी हे ईडी कोठडीत असून मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीत कमिशन एजंट महेंद्र जैन याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. २०१७ ते २०१९ या दरम्यान चर्चगेट येथील पंकज महल येथे चौधरी यांना कागदपत्रे आपण दिली होती, असे जैनने म्हटले आहे. देवेश उपाध्याय याच्या सांगण्यावरून आपण हे केल्याचेही जैनने जबाबात म्हटले आहे. उपाध्याय हा बेंचमार्क बिल्डकॉनसाठी काम करत होता आणि याच फर्मने चौधरी यांना पुणे येथील जमीन खरेदी करण्यासाठी कर्जाची काही रक्कम दिली होती, असे तपासातून समोर आले आहे. जैन याने ओमप्रकाश शारदा यांचेही नाव घेतले आहे. ते या कंपनीचे व्यवस्थापक होते आणि त्यांनी हे कर्ज चौधरी यांना दिले होते. दरम्यान शारदा यांचे सप्टेंबर- ऑक्टोबर २०१६ या दरम्यान निधन झाले आणि हा जमीन व्यवहार एप्रिल २०१६ मधील आहे, असेही जैन याने जबाबात सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे.






