मुंबईत पावसाची रिपरिप सुरू, आज अतिवृष्टीचा इशारा

ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

मुंबई (सहसंपादक सतीश बनसोडे) : मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत असून उंबरमाळी आणि कसारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने तसेच अंबरनाथ आणि वांगणी स्टेशन दरम्यानही ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने लोकलसेवा थांबवण्यात आली आहे.

अंबरनाथ, बदलापूर भागातही पावसाचा जोर वाढला असून अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे रात्री १२.२० वाजतापासून वांगणी ते अंबरनाथ दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने मुंबई महापालिकेची तानसा आणि मोडकसागर ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून धरणक्षेत्रात आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने १ वाजून १६ मिनिटांनी पावसाबाबत शेवटचे अपडेट्स दिले आहेत. त्यानुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या उपनगरील लोकल सेवेच्या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. कसारा भागात अवघ्यात ४ तासांत १३९ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. उंबरमाळी स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत असल्याचे भीषण छायाचित्र हाती आले आहे.

कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कसारा येथेही ट्रॅकवर पाणी भरले आहे. कसारा घाट येथे मोठा दगड ट्रॅकवर कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे. या स्थितीत बुधवारी रात्री १०.१५ वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डी दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली आहे. याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसणार असून त्याबाबतची माहिती नंतर देण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here